Dharashiv Declaring a wet drought, NCP blocks the national highway
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येडशी चौरस्त्यावर शुक्रवारी (दि.२९) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्यांना अडविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
शेतीमाल, भाजीपाला व फळांना हमीभाव कायदा करून भावांतर योजना लागू करावी. गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ७० रुपये हमीभाव द्यावा. प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील तरतुदी (पेरणी न होणे, प्रतिकूल हवामान, स्थानिक आपत्ती, कापणीनंतरची आपत्ती) पूर्ववत समाविष्ट कराव्यात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना, जनावरांच्या गोठ्यांना व पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व भरपाई द्यावी. वाहून गेलेले तलाव, बंधारे, रस्ते व पूल यांची तातडीने दुरुस्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात १००० ते ११०० मिमी इतका पाऊस झाला असून खरीप हंगामातील ५ लाख ७२ हजार हेक्टरवरील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे न करता तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत जाहीर केलेली १७९ कोटी रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून, ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याचे दुधगावकर यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात संजय पाटील दुधगावकर यांच्यासह भारत शिंदे, बालाजी डोंगे, नामदेव चव्हाण, इकबाल पटेल, किशोर आवाड, गौतम क्षीरसागर, बबन काळदाते, अॅड. प्रवीण शिंदे, अॅड. प्रमोद शिंदे, आप्पासाहेब आवाड, बाळासाहेब निगुट, गणपत भोसले, औदुंबर धोंगडे, शिवाजी ढोले, संभाजी गायकवाड, हनुमंत गरड, राजेंद्र शिंदे, अनिल जाधव, प्रशांत मेटे, गणेश धाबेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.