Chhatrapati Sambhaji Maharaj visit Bhoom
भूम : भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून पिके वाहून गेली, शेतात मातीऐवजी गोट्यांचे थर दिसू लागले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आज (दि.२५) मात्रेवाडी, माणकेश्वर, जावळा, शिरसाव आणि सावरगाव परिसराचा दौरा केला.
दौऱ्याची सुरुवात मात्रेवाडी येथून झाली. येथे शेतकरी लक्ष्मण पवार यांनी शेतीचे नुकसान, कर्जबाजारीपणा व ट्रॅक्टरच्या हप्त्यांच्या विवंचनेतून आत्महत्या केली होती. या घटनेने व्यथित झालेल्या संभाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यावेळी त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करताना सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ पंचनाम्यांपुरते मर्यादित न राहता त्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.”
यानंतर सावरगाव शिवाराची पाहणी करताना त्यांनी शेतातील सुपीक माती वाहून जाऊन गोटे साचल्याचे चित्र पाहिले. यावर त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले की, “शेतकऱ्याच्या शेतात मातीच उरली नाही तर तो कसली शेती करणार? अशा परिस्थितीत तातडीने माती भरणे व पुनर्वसनाच्या उपाययोजना करा.”
दरम्यान, माणकेश्वर येथील वस्तीमध्ये पूर पाण्यामुळे तब्बल ५५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत. संभाजी महाराजांनी या कुटुंबांना धीर देत ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या या आक्रमक दौऱ्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला असून, “गावोगाव झालेल्या नुकसानीला न्याय मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
या दौऱ्यात स्वराज्य संघटनेचे नीलेश वीर, विठ्ठल बाराते, भाऊसाहेब कराळे, गणेश अंधारे, सागर गायकवाड, अभीशेख कराळे, तेजस अवताडे, वैभव बागल, अरविंद हिवरे, ऋतिक वीर, अनिकेत आकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.