महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणारे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. Pudhari Photo
धाराशिव

Chandrashekhar Bawankule | उमरगा येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवला

सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा उमरगा येथे शुक्रवारी, (दि ०८) सकाळी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महसूल मंत्र्यांना शेतकरी कर्ज माफीसह इतर मागणीचे निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णा साहेब पवार यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पवार यांना ताब्यात घेतले.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी महसूल मंत्री यांना ग्रामीण भागातील विविध संस्था, संघटना, महिला व नागरिकांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर महसूल मंत्री तुळजापूरला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वाहनाचा ताफा शहरात राष्ट्रीय महामार्गावरील तहसील कार्यालया समोर येताच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून पवार यांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून ठाण्यात बसवले. महसूल मंत्री बावनकुळे यांचा ताफा निघून गेल्यानंतर काही वेळाने पोलीसांनी पवार यांना समज देऊन सोडून दिले.

महसूल मंत्री बावनकुळे हे शनिवारी रात्री मुरूम येथील विठ्ठल साई शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. मेळावा संपल्यावर मुरूम येथे रात्रीचा मुक्काम करून शुक्रवारी, सकाळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या उमरगा येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी चालुक्य परिवाराच्या वतीने महसूल मंत्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, संजय कोडगे, गुलचंद व्यवहारे, इंद्रजीत देवकते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, ग्रामीण तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, सयाजी चालुक्य, अॅड प्रवीण तोतला, अँड जी के गायकवाड, आयएमए अध्यक्ष डॉ अनंत मुगळे, सुनिल कुलकर्णी, सरपंच अनिल बिराजदार, मेघराज बरबडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, तसेच जिल्ह्यात पवनचक्की कंपनीची वाढती गुंडगिरी, शेतकऱ्यांच्या जमीनीवर अनाधिकृत कब्जा व मारहाण केली जात आहे. येणेगुर येथील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती ओढवून देखील प्रशासनाने कसलीही मदत केली नाही. त्यामुळे उपचाराअभावी पिडीत महिलेचा जीव गेला. याबाबत महसूल मंत्र्यांना निवेदन देण्यापुर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अण्णासाहेब पवार, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT