

Final decision to provide Rs 86 crore assistance to farmers in Umarga-Lohara area
लोहारा, पुढारी वृत्तसेवा : लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप व २०२३ मधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त ७९,८८० शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ८६.४३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. तसा शासन निर्णय नुकताच जारी झाला आहे.
शेतकरी नेते अनिल जगताप यांनी ही माहिती दिली. यामध्ये लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना ३३.७० कोटी तर उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५२.७५ कोटी असे एकूण ८६.४३ कोटी शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे.
या मदतीसाठी जगताप यांनी गावपातळीपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करून, त्यांच्या वतीने पुनर्वसन सहसचिव कैलास गायकवाड यांच्यासमोर प्रस्ताव सादर केला.
आमदार प्रवीण स्वामी यांना सोबत घेऊन मंत्रालयात केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला. जगताप यांनी खरीप २०२० मध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयात यशस्वी याचिका करून ४५५ कोटी मिळवून दिले.
खरीप २०२० मध्ये व्याज याचिका दाखल करून १९५ कोटींच्या व्याजासाठी राज्यातील पहिली याचिका दाखल केली. तर खरीप २०२१ मध्ये स्वतःच्या नावाने ३७४ कोटींची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. खरीप २०२२ मध्ये राज्य तक्रार निवारण समितीतून यशस्वी निर्णय घेऊन केंद्र सरकारकडून रक्कम वसूल केली.
तसेच खरीप २०२३ मध्ये २९३ कोटींचे वाटप झाले असून ५७ मंडळांत २५ टक्के अग्रीम मंजूर करण्यात आला. आजपर्यंत पीकविमाविषयक २६ बैठकांत सक्रीय सहभाग करून जिल्हा, विभागीय व मंत्रालयस्तरीय बैठकात उपस्थिती नोंदवून शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला.