ईट : भूम तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईट येथील बाजारपेठेत गणपती व गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने सणाच्या दिवसांतही बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
ईट बाजारपेठेवर परिसरातील १७ ते १८ गावांचा व्यवहार अवलंबून आहे. खरीप हंगामातील नगदी पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन असते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जोमाने आलेली पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला आहे.१४ सप्टेंबरला गणपतीचे, तर १७ सप्टेंबरला गौरीचे आगमन होणार आहे.
सणासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने विविध वस्तूंनी सजवली आहेत. मात्र, शनिवारचा आठवडी बाजार आणि सणाचा बाजार असूनही अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. गणपती व लक्ष्मीचे मुखवटे, सजावटीचे साहित्य, खेळणी आदी विक्रेत्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत अनेक विक्रेत्यांना अपेक्षित विक्री झालेली नव्हती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्री निम्म्याहून कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
शिल्लक माल पुढील वर्षापर्यंत सांभाळणेही व्यापाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे.दोन ते अडीच लाखांच्या व्यवसायाला यंदा फटका‘गणपती व लक्ष्मीच्या मुखवट्यांचा दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचा व्यवसाय होतो. यंदा मात्र ५० हजार रुपयांचीही विक्री होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. कच्चा माल व इतर खर्च मिळून आतापर्यंत सुमारे एक लाख रुपये खर्च झाले आहेत,’ अशी व्यथा मूर्तिकार सतीश तुकाराम कुंभार यांनी व्यक्त केली.
‘गेल्या २५ वर्षांपासून ईट येथे सणाच्या बाजारात सजावटीचे साहित्य विकते. यंदा दुष्काळामुळे लोक नवीन साहित्य खरेदी करण्याचे टाळत आहेत. महागाईही वाढली आहे. गेल्या वर्षी १५० रुपयांना मिळणारी माळ यंदा २५० रुपयांना मिळत असल्याने विक्री निम्म्याने घटली आहे,’ असे रहेना गफूर अत्तार यांनी सांगितले.‘पोळा, गणपती व लक्ष्मी सणासाठी सुमारे दोन लाख रुपयांचा माल भरला आहे. मात्र, यंदा अपेक्षित विक्री होत नसल्याने मोठा फटका बसत आहे. शिल्लक माल पुढील वर्षापर्यंत सांभाळणेही कठीण आहे,’ असे अजित अनंत बोंदर्डे यांनी सांगितले.