धाराशिव : आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत एकूण 2,483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून, शासनाकडे 3 कोटी 74 लाख 25 हजार 211 रुपये इतकी विमा रक्कम जमा झाली आहे.
सन 2023 मध्ये 861 रुग्णांवर, सन 2024 मध्ये 1,050 रुग्णांवर उपचार करण्यात आले. सन 2025 मध्ये या संख्येत लक्षणीय वाढ होऊन एकूण 2,483 रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ मिळाला. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांची ही कामगिरी रुग्णालयाच्या सक्षम प्रशासन व कार्यक्षम व्यवस्थापनाचे द्योतक ठरली आहे.
या यशामागे अधिष्ठाता डॉ. शैलेन्द्र चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. स्मिता गवळी तसेच अधिसेविका व संपूर्ण आरोग्य पथकाचे नियोजन, प्रशासन आणि समन्वय महत्त्वाचा ठरला. अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षातच 2,483 रुग्णांना या योजनेचा मोफत लाभ मिळाला.
मेडिसीन, सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, ईएनटी, ॲनस्थेसिया, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी या सर्व विभागांचे या यशात मोलाचे योगदान आहे. विभागप्रमुख डॉ. प्रविणकुमार गोवंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय समन्वयक डॉ. दत्ता चौरे, डॉ. साजिद शेख, डेटा एन्ट्री ऑपरेटर सत्यजित मुळे, सदाशिव कांबळे, सारिका शिंगाडे, आरोग्य मित्र व स्टाफ नर्सेस यांनी सातत्याने मेहनत घेतली. योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचली आहे.
सध्या रुग्णालयात आधुनिक उपचारयंत्रणा कार्यान्वित असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स व नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी व उपचार सुरू आहेत. उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णांना मोफत व दर्जेदार सेवा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत सहज पोहोचावा यासाठी यंत्रणा सदैव सतर्क ठेवण्यात आली असून, यामुळेच नव्याने सुरू झालेले असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव कार्यक्षमतेत अव्वल ठरले आहे.
सामाजिक उपक्रमांतही पुढे
सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्येही रुग्णालयाचा उत्स्फूर्त सहभाग असून समाजात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रुग्णालयाची महत्त्वाची भूमिका आहे. जिल्ह्यासह परिसरातील भागातून शस्त्रक्रिया व विविध आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.