

बीड ः जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमध्ये अनेक विद्यार्थी कागदोत्री उपस्थित असल्याचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर दि.20 फे ब्रुवारीपर्यंत सर्व शाळांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली, परंतु अशी ठरवून केलेल्या तपासणीत सत्य परिस्थिती समोर येणारच नाही, अचानकपणे केलेल्या तपासणीतच खरी उपस्थिती आणि उपलब्ध असलेल्या सुविधांबाबतचे सत्य समोर येऊ शकणार आहे.
बीड जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता दिव्यांग कल्याण विभागाकडून तब्बल 48 निवासी/अनिवासी विद्यालय आहेत. या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व इतर सुविधा मिळाव्यात याकरिता कोट्यावधी रुपयांचे अनुदान संबंधीत संस्थांना दिले जाते. तसेच या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व इतर सर्व सेवांसाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत.
अर्थातच या शाळांचा कारभारही मोठा असतो. या विद्यालयांच्या माध्यमातून दिव्यांगांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे असा उदात्त हेतू शासनाचा आहे. परंतु काही संस्था या निव्वळ कागदोपत्री चालत असल्याची बाब यापूर्वी झालेल्या तपासणीत समोर आली. बीड जिल्ह्यातील तीन शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या नसणे, भौतिक सुविधांचा अभाव यामुळे या शाळांचे वेतन व अनुदान थांबवण्यात आले. तसेच या शाळांची मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला आहे, ही नक्कीच चांगली बाब आहे.
याच संदर्भात दैनिक पुढारीतून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर दिव्यांग कल्याण विभागाने 20 फे ब्रुवारीपर्यंत सर्वच शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही नक्कीच चांगली बाब आहे. परंतु अशा पद्धतीने तारीख जाहिर करुन तपासणी मोहीम सुरु केल्यास काही संस्थाचालक कागदोपत्री हजर असलेल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये हजर करतील, तसेच तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करतील अशी शक्यता आहे, त्यामुळे अशा ‘ठरवून’ केलेल्या तपासणीतून काहीच समोर येणार नाही, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.अचानकपणे तपासणी केल्यासच या दिव्यांग शाळांमधील गैरप्रकार समोर येऊ शकणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तशा पद्धतीने तपासणीचे नियोजन करण्याची देखील मागणी होत आहे.
तुकाराम मुंडेंच्या एन्ट्रीने झाले बदल
दिव्यांग विभागांतर्गत चालत असलेल्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती व इतर बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होतांना दिसत आहे. या विभागाचे सचिव म्हणून डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार हाती घेतल्यापासून बदल दिसू लागले आहेत. विशेषतः तुकाराम मुंडे हे मुळचे बीड जिल्ह्यातील असून या ठिकाणच्या दिव्यांग शाळांना शिस्त लावण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जावे अशी मागणी केली जात आहे.
त्रयस्थ यंत्रणेमार्फ त व्हावे मूल्यांकन
दिव्यांग कल्याण विभागांतर्गत असलेल्या या निवासी महाविद्यालयांची तपासणीही दिव्यांग कल्याण विभागाचे स्थानिकचेच अधिकारी करणार आहेत. यामुळे काही मर्यादा येऊ शकतात. याऐवजी दिव्यांग विभागाचे इतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी अथवा मुख्य कार्यालयातील अधिकारी अथवा त्रयस्थ यंत्रणेकडून अचानक तपासणीची मोहीम वरिष्ठ पातळीवरुन राबवणे आवश्यक आहे.