Zilla Parishad's mismanagement of assets exposed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या लाखो-कोट्यवधी रुपयांच्या जागा भूमाफियांच्या घशात जातातच कशा? मूळ मालक जागा परत मागतोच कसा? जि.प.तील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मालमत्तेची कागदपत्रे गहाळ केली जातात आणि त्याच आधारे कोट्यवधी रुपयांचा मोबदला, भाडे मागितले जात असल्याचा आरोप गुरुवारी (दि. २०) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. 'कुंपणच शेत खाऊ लागले तर त्याला कोण काय करणार,' असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.
अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जि.प. च्या जागांवरील अतिक्रमणाचा मुद्दा सदस्य रतन बत्तीसे व पंकज ठोंबरे यांनी उपस्थित केला. जि.प.च्या मालमत्तांची माहिती उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर शहरातील काही मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सर्व विभागांनी आपापल्या मालमत्तांची कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, अशी सूचना बांधकाम सभापती सचिन गरड यांनी केली. जागांना संरक्षक भिंती बांधून त्या ताब्यात घ्याव्यात, असे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल म्हणाले. दरम्यान अंगणवाड्यांतील निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दाही गाजला. अध्यक्ष गलांडे, उपाध्यक्ष जैस्वाल व सीईओ मिन्नू पी. एम. यांनी लाडसावंगी, करमाड येथे अचानक भेट दिली.
करमाडच्या अंगणवाडीत बालकांना केवळ बेचव मटकी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. बालकांना दर्जेदार व पोषणमूल्ययुक्त आहार देण्याचे निर्देश सीईओंनी दिले. तसेच न्यायालयीन प्रकरणांच्या संचिका व्यवस्थित ठेवाव्यात, शपथपत्रे वाचूनच स्वाक्षरी करावी आणि मूळ संचिका नसल्यास स्वाक्षरी करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मनुर, बोरसर येथे गणित विषयाचे शिक्षक द्यावेत, अशी मागणी मनोज गायके यांनी केली. वाकला येथे कमी विद्यार्थी दाखवून शिक्षकांचे समायोजन केल्याचा आरोप संजय पा. निकम यांनी केला. शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक न देता समायोजनात सोयीचे निर्णय घेतल्याचा आरोप निकम व पंकज ठोंबरे यांनी केला.