Work on connecting the main water pipeline near Nakshatrawadi remains incomplete due to a gap.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नवीन पाणीपुरवठा योजनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नक्षत्रवाडीहून शहराकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गॅपमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. नाथ सीड्स कंपनीजवळील नाल्यावर जलवाहिनीमध्ये निर्माण झालेला हा मोठा गॅप सध्या पाणीपुरवठ्यासाठी अडथळा ठरत असून पंप सुरू झाल्यानंतरही शहरात पाणी कसे पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्रच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत जायकवाडी धरण परिसरात उभारण्यात आलेले जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून, पंप व मोटारी बसविण्याचे कामही पूर्णत्वास आले आहे.
दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१९ मार्च) पंप सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडी या सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची स्वच्छता केली जाणार आहे. तसेच जायकवाडी येथून येणारे पाणी नक्षत्रवाडी येथे उभारलेल्या ४०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरात पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
मात्र नक्षत्रवाडी ते शहर या मार्गावरील काही ठिकाणी जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. विशेषत: नाथ सीड्स कंपनीजवळील नाल्यावर मोठा गॅप असल्याने जलवाहिनी टाकण्यासाठी पिलर उभारून त्यावर पाईपलाईन बसवावी लागणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचले तरी ते शहरात आणण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनेक ठिकाणी जोडणीचे काम शिल्लक
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या अद्याप पूर्णपणे जोडलेल्या नाहीत. यात पैठण रोडवरील नाथ सीड्स कंपनी परिसरासह शहरातील आणखी काही ठिकाणीही जोडणीचे काम अपूर्ण आहे. रेल्वेस्टेशन परिसर, मकबरा आणि मकाईगेट आदी भागांतही पाईपलईनचे जोडणीचे काम प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या ठिकाणी जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जुन्या जलवाहिन्यांतून शहरात येणार नवीन योजनेचे पाणी
नक्षत्रवाडी येथील जुन्या एमबीआरमध्ये नवीन पाणी योजनेतील सुमारे १०० एमएलडी पाणी साठवण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी नवीन योजनेची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. जुन्या जलवाहिन्यांद्वारे हे पाणी शहरातील जलकुंभांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. नवीन पाणी सुरू झाल्यानंतर जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरतील व पाणीपुरवठा सुधारेल, या एमबीआरपासून सुधाकरनगर, देवळाई, म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी, सिडको ते हसूल या भागांनाही पाणी देता येईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.