हतनूर : शेतात काम करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रुईखेडा शिवारात शनिवारी (दि.२८) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. आनंदीबाई रामभाऊ सुसलादे (वय ५२, रा.रुईखेडा असे मृत महिलेचे नाव आहे.
रामभाऊ सुसलादे यांची पळसगाव (ता. खुलताबाद) शिवारात गट नं.४६ मध्ये शेती असून शनिवारी दुपारच्या सुमारास आनंदीबाई मका पिकाच्या कडेला काम करत असताना त्यांचा तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. विद्युत प्रवाह सुरू असणाऱ्या विद्युत तारेच्या स्पर्शाने त्या जागीच कोसळल्या. जवळच असलेल्या पतीच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लाकडाच्या दांड्याने त्यांना तारेपासून बाजूस केले. व त्यांना तातडीने हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
रुईखेडा पळसगाव शिवारातील विजेच्या लोंबकळणाऱ्या व जीर्ण होऊन तुटण्याच्या मार्गावर आसलेल्या सर्व विद्युत तारा बदलण्यात याव्यात व पुन्हा जीवित हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन महावितरण कडून संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच प्रभाकर सुसलादे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.