नालासोपारा/विरार : वसईच्या खदानीत पुन्हा एकदा दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खदानींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे दोन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे.
वसई पूर्वेच्या नवजीवन येथे दोन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.26) दुपारी तीन च्या सुमारास ही घटना घडली. नसीम रियाजअहमद चौधरी (13), सोपान सुनिल चव्हाण (14) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील या खदाणी आहेत.
वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदानी आहेत. पावसाळा असल्याने या खदानी पाण्याने भरून गेल्या आहे. गुरुवारी (दि.26) दुपारी गांगडीपाडा येथे राहणार्या चार ते पाच जणांचा ग्रुप अंघोळीसाठी खदानीत गेले होते. अंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने खदानीत बुडाले. याची माहिती आजूबाजूला राहणार्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नदी, तलाव, खदाणी, धबधबे अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.
विशेष बाब म्हणजे नवजीवन येथील खदानीत आतापर्यंत 57 लोकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या परिसरातील लोकांनी अनेक वेळा महसूल विभाग तथा तहसीलदार कार्यालयात या उघड्या खदानीला कुंपण लावण्याची मागणी केली होती. मात्र इतक्या लोकांचा मृत्यू होऊन देखील महसूल प्रशासन यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई न करता लोकांचा जीव टांगणीला लावलेला आहे.