Watermelon farming brings sweetness to the lives of farmers in the taluka
संजय मूचक
कन्नड : मागील वर्षी कलिंगड पिकाला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, कलिंगड शेतीने शेतकऱ्यांच्या जीवनात अक्षरशः गोडवा आणला आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेत सावध भूमिका घेत कलिंगड लागवड केली होती. परिणामी यंदा बाजारात आवक कमी राहिल्याने दर चांगले मिळत आहेत.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, त्यातच रमजान महिन्याची सुरुवात झाल्याने बाजारात कलिंगडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळत असून, अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाल्याचे सांगत आहेत. यावर्षी काही भागात शेतकऱ्यांना एकरी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कलिंगड लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शेतीची योग्य मशागत करून बेड तयार केले जातात. त्यावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन केले जाते. त्यानंतर सुधारित वाणांच्या कलमांची लागवड केली जाते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेणखत, रासायनिक खते तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते.
कलिंगड पिकासाठी एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र यंदा मिळालेल्या चांगल्या उत्पादन आणि समाधानकारक बाजारभावामुळे हा खर्च वजा जाता शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे कलिंगड शेतीकडे शेतकऱ्यांचा कल पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कलिंगडाने यंदा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास हातभार लावला असून, योग्य नियोजन व बाजारपेठेचा अंदाज घेतल्यास नगदी पिकांमधून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
वानोळा झाला दुर्मिळ
यंदा कलिंगडाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकाची विशेष राखणदारी करावी लागत आहे. पूर्वी शेजारी, नातेवाईक तसेच ओळखीच्या लोकांना वानोळा म्हणून कलिंगड देण्याची प्रथा होती; मात्र यावर्षी वाढलेल्या दरामुळे कलिंगड जणू झेड प्लस सुरक्षेत गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.