Water supply to 900 has been cut off for 14 days despite connecting the water mains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
नव्या मुख्य जलवाहिनीवरील गॅप जोडण्यासाठी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर गेल्या आठवड्यात सहा दिवसांचा शटडाऊन घेतला. परंतु, हे काम तब्बल १२ दिवसांनंतर पूर्ण झाले. त्यामुळे १३ व्या दिवशी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काढलेले ४ पाईप पुन्हा जोडण्यात आले. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजेपी) अधिकार्यातील बेबनावामुळे १४ व्या दिवशीही या जलवाहिनीतून पाणीपुरवठाच सुरू झाला नाही. हा प्रकार कळताच महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे टाकळी फाट्यावर शनिवारी (दि. २९) सायंकाळी उशिरापर्यंत तळ ठोकून होते.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किमी अंतरावर २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर १२ ठिकाणी गॅप जोडणीची कामे बाकी होती. त्यातील टाकळी फाटा आणि साईमंदिर या दोन ठिकाणच्या गॅप जोडणीसाठी ९०० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत असल्याने त्या जलवाहिनीवर सहा दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला. मुख्य जलवाहिनीच्या जोडणीसाठी जास्त खोलीचा खड्डा केला. त्यानंतर खाली असलेल्या ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे चार पाईप काढण्यात आले. हे पाईप काढताना बाजूलाच १२०० मि.मी. व्यासाची जुनी लाईनदेखील होती. त्यामुळे तिला धक्का न लावता हे काम करायचे असल्याने सावधानीपूर्वक काम करण्यात आले.
परिसरात काळी माती असल्याने त्यामुळे अडचणी आल्या. त्यामुळे कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या कामगारांना काम पूर्ण करण्यासाठी उशीर लागल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजेपी) अधिकाऱ्यांनी सांगितले. हे गॅप जोडणचीचे काम १२ व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. २७) पूर्ण झाले. त्यामुळे ९०० च्या जलवाहिनीचे काढलेले पाईप जोडून १३ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ही जलवाहिनी पाणीपुरवठ्यासाठी सज्ज केली. परंतु, आताच पाणीपुरवठा सुरू करू नका, नसता जलवाहिनीचे पाईप निखळतील, असे सांगत पाणीपुरवठा सुरू केला नाही. एमजेपीच्या दोन विभागांतील अधिकाऱ्यांत समन्वय नसल्यामुळेच १४ व्या दिवशीही लाखो शहरवासीयांना पाणीटंचाईचा समाना करावा लागला.
अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव
मुख्य जलवाहिनीचे गॅप जोडल्यानंतर ९०० च्या जलवाहिनीचे पाईप जोडण्यात आले. त्यानंतर सिव्हील आणि मेकॅनिकल विभागाच्या बरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलवाहिनीतून पाणीप-रवठा सुरू करावा की नाही यावर घरी बसूनच तर्कवितर्क सुरू केले. अधिकाऱ्यांतील या असमन्वयामुळे जनता भरडली जात आहे.