Water supplied to four reservoirs through the new scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतील १५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अखेर कार्यान्वित झाली आहे. या जलवाहिनीतून बुधवारी (दि.१९) एन-५ येथील आर-२, आर-३, टीव्ही सेंटर आणि हरसिद्धी या चार जलकुंभांमध्ये पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आज गुरुवारी (दि.२०) एन-७येथील आणखी दोन टाक्यांमध्ये पाणी घेण्याचे नियोजन असून जलवाहिनी सुरू झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ ते २० एमएलडीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील गॅप कमी होण्यास मदत झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी आणण्यासाठी नवीन योजनेत १५००, ११०० आणि २ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५०० मिमी जलवाहिनी जुलैअखेरपर्यंत सुरू करून शहरातील नऊ जलकुंभांना जोडण्याचे नियोजन होते. मात्र, २२ जुलै रोजी एन-५ येथील व्हॉल्व्ह सुरू करून या जलवाहिनीतून पाणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर काही तासांतच मुख्य जलवाहिनीवरील वेल्डिंग निखळल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठा थांबवून जलवाहिनीची दुरुस्ती करावी लागली. गळती दुरुस्तीनंतर जलवाहिनीची स्वच्छता, पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण तसेच अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर तब्बल महिनाभराने बुधवारी चार जलकुंभांमध्ये पाणी सोडण्यात आले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर योजनेच्या कामाला वेग देण्यात आला असून, जॅकवेल, अंतर्गत जलवाहिन्या, जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभांच्या कामासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर नवीन योजनेतून वाढीव पाणी उपलब्ध होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे अंतर कमी झाले आहे.
त्यामुळे १० दिवसांआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आता कमी झाल्या आहेत. यात मरिमाता परिसरातील १३ ते १४ दिवसांचा गॅप कमी होऊन सात दिवसांवर आला आहे. चिकलठाणा परिसरात सात ते आठ दिवसांआड, तर शहरातील बहुतांश भागात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान १५०० मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हा गॅप आणखी एका दिवसाने कमी होण्याची शक्यता आहे.
आज दोन टाक्यांना पाणी
शहरातील आर-२, आर-३, टीव्ही सेंटर आणि हरसिद्धी या चार टाक्यांमध्ये बुधवारी पाणी घेण्यात आले. आज गुरुवारी एन-७ येथील आणखी दोन टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर जलवाहिनीची क्षमता वाढवून आणखी जलकुंभ जोडण्याचे नियोजन आहे.
१५ ते २० एमएलडीने पाणी वाढले शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीतून चार टाक्यांमध्ये पाणी घेण्यात आले आहे. उद्या आणखी दोन टाक्यांमध्ये पाणी घेण्याचे नियोजन आहे. या जलवाहिनीमुळे शहराला १५ ते २० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत आहे.अमोल येडगे महापालिका आयुक्त