Marathwada : मराठवाड्यात धरण, तलावांचे पाणी पिण्यासाठी राखीव File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada : मराठवाड्यात धरण, तलावांचे पाणी पिण्यासाठी राखीव

विभागीय आयुक्तांचे आदेश, रब्बीच्या नियोजनाला ब्रेक

पुढारी वृत्तसेवा

Water in dams and lakes in Marathwada reserved for drinking purposes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या मान्सूनच्या तीन महिन्यांत एकूण सरासरीच्या केवळ ७० टक्केच पाऊस झाला आहे. ७सप्टेंबरपर्यंत विभागात सरासरीच्या ५५२.२ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. त्यातुलनेत केवळ ३८८.३ टक्केच हजेरी लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यावर टंचाईचे गडद ढंग निर्माण होत असल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आठही जिल्ह्यांतील सर्व धरणांसह लघु, मध्यम प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. त्यासोबतच रब्बी हंगामाच्या पेरण्यांचे नियोजनाला ब्रेक देत अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

मराठवाड्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे कमी पर्यजन्यमान होणार असल्याचे संकेत यापूर्वीच हवामान विभागाने दिले आहेत. त्यानुसार जून आणि जुलै या दोन महिन्यांत ६१ पैकी केवळ १४ दिवसच मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसातच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. ऑगस्टमध्ये दमदार पाऊस होईल, असे संकेत होते. परंतु, संपूर्ण महिन्यात कुठे ३ तर कुठे ४ दिवसच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता पिकांची स्थिती अतियश बिकट झाली आहे. त्यात पावसाने दीर्घ काळापासून दडी मारल्याने आता मराठवाड्यात टंचाईची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात १ जून ते ७ सप्टेंबर या मान्सूनच्या सव्वा तीन महिन्यांमध्ये सरासरी समारे ५५२.२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, त्यातुलनेत केवळ ७० टक्केच हजेरी लावली आहे.

गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत मराठवाड्यात तब्बल १०९ टक्के म्हणजेच ६०३ मि.मी. पाऊस झाला होता. दरम्यान, गतवर्षी झालेल्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत यंदा ३८८.३ मि.मी. म्हणजेच ५७.१ टक्केच पाऊस झाला आहे. विभागात परभणी ५७.३ मि.मी., लातूर. ५४.६ मि.मी., धाराशिव ६६.२ मि.मी. आणि बीड ६७.९ मि.मी. अशी सर्वात कमी पावसाची नोंद या चार जिल्ह्यांत झाली आहे. हिंगोली ७२.१ नांदेडमध्ये ७६.३ मि. मी पाऊस झाला आहे. संभाजीनगरमध्ये ८५.२ आणि जालन्यात ८३ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील ११ प्रमुख धरणांमध्ये केवळ ६७.७३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

धरणांचा जलसाठा

त्यात जायकवाडी ८९.९७ टक्के, विष्णुपुरी ९४.२३ टक्के, पैनगंगा ६८.९३ टक्के तर येलदरी ६२.५२, मानार ६१.४४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परंतु, उर्वरित सहा धरणांपैकी परभणीतील निम्न दुधना २२.४९ टक्के, हिंगोलीच्या सिद्धेश्वरमध्ये ३५.०६ टक्केच तर बीडच्या माजलगाव प्रकल्पात २५.२० टक्के आणि केजच्या मांजरामध्ये १२.२६ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. तशीच स्थिती धाराशिवच्या निम्नतेरणाची असून या प्रकल्पात २४.२७ टक्के जलसाठा आहे.

असे आहेत आदेश

विभागात तब्बल ३० टक्के पावसाची तूट आहे. ज्या जिल्ह्यात धरण आणि लघु, मध्यम प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील संपूर्ण पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवा, गस्त पथक लावण्यात यावेत, ज्या प्रकल्पांमध्ये अनधिकृतपणे पाणी उपसा होत आहे, तेथे पंप जप्त करून कारवाई करणे, सप्टेंबरनंतर कालवा समितीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे रब्बीचे नियोजन आताच करू नये

१८१ टँकर सुरू

मराठवाड्यात १०५ गावे आणि ५५ वाड्यांना सध्या शासकीय ३ आणि खासगी १७८ अशा १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० टँकर तर जालन्यात २८, बीडमध्ये ५४ आणि धाराशिवमध्ये ९ असा समावशे आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT