Water has reached Kaudgaon from the main pipeline.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्रात किरकोळ कामे शिल्लक आहेत. तर मुख्य जलवाहिनीच्या जॉइंटची निखळलेली वेल्डिग केल्यानंतर पाणी उपशाची प्रक्रिया यशस्वीरीत्या सुरू झाल्याचे मंगळवारी (दि.३१) विधिज्ञ, महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले. तर सायंकाळी मुख्य जलवाहिनीत घेतलेले पाणी कौडगावापर्यंत दाखल झाले. आता तेथून केवळ २ किलोमीटर अंतरावरच बिडकीन आहे.
जायकवाडी धरणातील पाणी अगोदर जॅकवेलमध्ये घेण्यात आले. त्यानंतर २३ मार्चपासून २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्यास सुरुवात केली. १५ किमीपेक्षा जास्त जलवाहिनीत पाणी घेण्यात आले. कारकीन येथे जलवाहिनीची वेल्डिग निखळल्याने ४ दिवस टेस्टिंग बंद होती. ही सर्व प्रक्रिया मागील आठवड्यात न्यायालयास अवगत करण्यात आली होती. न्यायालयाने नवीन पाणीपुरवठा योजनेशी संबंधित सर्व वकिलांना नक्षत्रवाडी येथील जलश-द्धीकरण केंद्राची पाहणी करावी, अशी सूचना केली होती.
त्यानुसार मंगळवारी दुपारी मनपा, मजीप्रा आणि न्यायालयातील वकिलांनी पाहणी केली. सर्व जशुद्धीकरण केंद्र, फिल्टरबेड, एमबीआरची बारकाईने पाहणी केली. यावेळी जीव्हीपीआर कंपनीचे ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन. धोर्डे, मजीप्राचे विनोद पाटील, अमोल वसमतकर, मनपाचे संभाजी टोपे, न्यायालयाचे मित्र शंभूराजे देशमुख, मूळ याचिकाकर्ता अमित मुखेडकर, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांच्यासह मनपाचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कौडगावपर्यंत पाणी दाखल जलवाहिनीची वेल्डिंग, अल्ट्रॉसॉनिक टेस्ट घेण्यात आली. दुपारी ३:०० वाजता जायकवाडी धरणातील ३७०० अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात आले. यापूर्वी एकाच पंपाद्वारे पाणी घेण्यात येत होते. मंगळवारी दोन पंपांचा प्रयोगसुद्धा केला. तो यशस्वी झाला. सायंकाळी ६.५९ वाजेच्या सुमारास पाणी ढोरकीनहून पुढे कौडगावपर्यंत दाखल झाले होते. या टेस्टिंगमध्ये कुठेही तांत्रिक प्रश्न निर्माण झाला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा दोन पंपांद्वारेच जलवाहिनीत पाणी घेतले जाईल.