Water crisis looms in Kannada taluka
संजय मुचक
कन्नड : मार्च महिना सुरू होताच कडाक्याचे ऊन पडू लागल्याने तालुक्यातील जलसाठ्यांमध्ये वेगाने घट होत आहे. उपविभागीय जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, तालुक्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सरासरी पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, येणाऱ्या उन्हाळ्यात काही गावांना पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कन्नड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील महत्त्वाच्या मध्यम प्रकल्पांपैकी शिवना टाकळी धरणात ७०% अंबाडी धरणात सध्या ४६.५०%, अंजना पळशी ७६.९३% तर पूर्णा- नेवपूर प्रकल्पात ४९.९४% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी वाढते वाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याचा वाढता उपसा पाहता हे पाणी किती काळ टिकणार, यावरच तालुक्याचे गणित अवलंबून आहे. ?तालुक्यातील लघु प्रकल्पांची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे.
तालुक्यातील २० लघु प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. लघु प्रकल्पांची एकूण सरासरी पाहता, पाणीसाठा केवळ ३० ते ३५ टक्क्यांच्या घरात आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारे पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर होऊ शकतो. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास मे महिन्यात टँकरची धावपळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत.