Want to take advantage of debt relief? Complete e-KYC immediately : Collector
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ७०१ खातेदारांपैकी १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४० हजार २२९ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
उर्वरित ६४ हजार ८९९ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले. गुरुवारी (दि.३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले पीक कर्ज, पुनर्गठित पीक कर्ज योजनेत समाविष्ट असून, ३० सप्टेंबर २०२५ अखेरची थकबाकी आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेली रक्कम कर्जमाफीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वन टाईम सेटलमेंट'ची सुविधा उपलब्ध असून, ३१ मार्च २०२७ पर्यंत अतिरिक्त रक्कम भरून त्यांनाही लाभघेता येणार आहे.
ई-केवायसीसाठी 'त्या' पैसे घेणाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारणाऱ्या आपले सरकार पोर्टल किंवा महा-ई-सेवा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शासनाकडून केंद्रचालकांना शुल्क दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांची कोणतीही आर्थिक लूट सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.