वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी (दि. १३) बजाजनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली. मात्र या कारवाईत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप छोट्या व्यावसायिकांनी केला असून, मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
वाळूज औद्योगिक क्षेत्रासह नागरी वसाहतीतील मुख्य रस्ते व चौकांमध्ये हातगाड्या, टपऱ्या तसेच इतर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. रस्त्यांवर ग्राहकांची वाहने उभी राहत असल्याने नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे व कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता गणेश मुळीकर, क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ, सहाय्यक अभियंता योगेश तिडके व इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन जेसीबींच्या सहाय्याने कारवाई केली.
मोहटादेवी चौकापासून सुरू झालेल्या या मोहिमेत स्मशानभूमीसमोरील भाजी मंडई, हायटेक कॉलेज परिसर, महाराणा प्रताप चौक, जयभवानी चौक आणि कोलगेट चौकातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली. फळविक्रेत्यांच्या हातगाड्या, पानटपऱ्या तसेच रस्त्यावर वाढविलेली बांधकामे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
मोठ्या व्यावसायिकांना अभय ?
हायटेक कॉलेज परिसरात रस्त्याच्या एका बाजूची मोजणी करून पानटपरी हटविण्यात आली, मात्र समोरील बाजूस असलेल्या एका मोठ्या व्यावसायिकाच्या हॉटेलबाबत कारवाई न झाल्याने छोट्या व्यावसायिकांनी दुजाभावाचा आरोप केला. हातावर पोट असलेल्या फळ-भाजी विक्रेते व टपरीधारकांवर कठोर कारवाई होत असताना मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फळ-भाजी विक्रेत्यांचे अश्रू अनावर
अतिक्रमण हटाव मोहिमेपूर्वी एमआयडीसी प्रशासनाने ध्वनिक्षेपकाद्वारे दोन-तीन दिवस अतिक्रमणे स्वखर्चान हटविण्याचे आवाहन केले होते. काही विक्रेत्यांनी हातगाड्या आरोग्य उपकेंद्राच्या आवारात किंवा हायटेक कॉलेजसमोरील मैदानात हलवल्या होत्या. मात्र पथकाने तेथील टपऱ्याही जेसीबीने हटविल्याने अनेक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाल्याने अनेक फळ व भाजीपाला विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले.