वेरूळ: खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, पळसवाडी, आखतवाडा, चिंचोली, पिंपरी, गल्लेबोरगाव व कसाबखेडा परिसरात शनिवारी (दि. १२) दुपारी एक ते तीनच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावले असून, खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला. परिसरात कापूस, सोयाबीन, मका, तूर व बाजरीची पिके असून, त्यांच्या वाढीसाठी सध्या पावसाची आवश्यकता होती. पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाल्याने पिकांना फायदा होणार आहे.
वेरूळ येथील तेलवन तलाव, आजमपूर येथील चिमठा तलाव तसेच तिसगाव येथील काळापाणी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तलावांतील पाणीसाठ्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, आगामी रब्बी हंगामासाठीही त्याचा फायदा होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
वेरूळ परिसरातील फळबागांनाही या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र, तालुक्यातील उत्तर धरण अद्याप कोरडेच असल्याने काही भागातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. तालुक्यात सर्वदूर दमदार पावसाची गरज असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास उर्वरित जलसाठे भरून खरीप व रब्बी हंगामाला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तीन तलाव तुडुंब
वेरूळ येथील तेलवन तलाव, आजमपूर येथील चिमठा तलाव आणि तिसगाव येथील काळापाणी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे परिसरातील जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी रब्बी हंगामासाठीही या पाण्याचा फायदा होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.