वैजापूर : वैजापूर ते श्रीरामपूर रस्त्याचे 105 कोटींच्या तरतुदीतून हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरण कामाला शेतकऱ्यांनी त्यांच्या वाढीव शेतजमीन भूसंपादनाचा मोबदला हातात पडल्याशिवाय काम करू न देण्याची आक्रमक भूमिका शनिवारी (21) सकाळी खंबाळा फाटा येथे घेतली.आमच्या जमिनीची नवीन भूसंपादन कायद्यान्वये मोबदला आम्हाला द्यावा त्यांनंतर रस्त्याचे काम कंत्राटदारांनी सुरू करावे अशी मागणी बहुसंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनात केली.
2024 या वर्षात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वैजापूर - श्रीरामपूर रस्त्याचे 20 किलोमीटर कामासाठी 105 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामातील 20 किलोमीटर अंतरासाठी रस्ते विकास विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यात पूर्वीचा 33 फूट रुदींचा रस्ता तब्बल 100 फूट करण्याची दुर्तफा मार्किंग केल्यामुळे नऊ ते दहा गावांतील शेतकऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेषत: हा विकास आराखडा तयार करताना रस्ते विकास विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाढीव जमिनीचा मोबदला कसा मिळणार आणि कोण देणार यांचा कोणताही विचार न करता रस्त्याचे खोदकाम याठिकाणी सुरू केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी खंबाळा फाटा येथे रस्त्याचे काम बंद पाडले.
खंबाळा ग््राामपंचायतीचे माजी सरपंच बाबासाहेब लांडे, मराठा सेवक प्रशांत सदाफळ, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, राहुल लांडे, डॉ बाबासाहेब इंगळे, प.स. सदस्य शिवाजी लांडे, वेणूनाथ इंगळे,अमोल गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
रस्ते विकास विभागाचा गलथान कारभार
शेतकऱ्यांना त्यांच्या वाढीव जमिनीचा मोबदला कसा मिळणार आणि कोण देणार यांचा कोणताही विचार न करता रस्त्याचे 105 कोटी रुपयांच्या रस्ता खोदकामा कामाला शनिवारी अचानक सुरुवात केली. होणाऱ्या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना मावेजा कोणाकडून मिळणार कधी मिळणार याची माहिती रस्ते विकास विभागाने शेतकऱ्यांना दिलीच नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खंबाळा फाटा येथे धाव घेत वैजापूर, ते श्रीरामपूर रस्त्याचे काम बंद पाडले. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या वाढीव शेत जमीन भूसंपादनाचा मोबदला हातात पडल्याशिवाय काम करु न देण्याची आक्रमक भुमिका घेतली.