छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून रिक्षाचालकावर चाकू व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कमलेश मोहन चव्हाण आणि अनिकेत अविनाश साळवे (दोघे रा. निसर्ग कॉलनी, पेठेनगर, भावसिंगपुरा) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी दोषी ठरवून पाच वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
प्रकरणात ऋतिक उमेश आव्हाड (रा. आमेन चौक, भीमनगर भावसिंगपुरा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादीने रिक्षामधून मिलकॉर्नर येथून प्रवाशांना बसवून निसर्ग चौक, भीमनगर येथे सोडले. त्याचवेळी फिर्यादीच्या ओळखीचे कमलेश चव्हाण आणि अनिकेत साळवे हे तेथे आले. त्यांनी अचानक फिर्यादीच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी दोन्ही आरोपींच्या हातात चाकू होता. त्यामुळे फिर्यादीने त्यांना काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तू जास्त माजला आहे.
नेहमी आम्हाला शिवीगाळ करत असतो, आज तुला संपवूनच टाकतो, असे म्हणत त्यांनी फिर्यादीच्या डोक्यावर चाकूने वार करून तसेच पोटावर हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताना ऋतिकच्या उजव्या हातालाही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी दगडाने डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. जीव वाचवण्यासाठी फिर्यादीने तेथून धूम ठोकली. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक व्ही. डी. जगदाळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी ९ साक्षीदार तपासले. त्यात एक फितुर झाला. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त ६ महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार सय्यद मुख्तार आणि अंमलदार अनिल कांबळे यांनी काम पाहिले.