Khichdi food poisoning
कन्नड : तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे खिचडी खाल्ल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती बिघडलेल्या दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान एका पाठोपाठ मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आयुष नारायण थोटे (वय २) याचा गुरुवारी (१० सप्टेंबर) मृत्यू झाला, तर त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या गायत्री नारायण थोटे (वय ६) हिचाही शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नारायण साहेबराव थोटे यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (९ सप्टेंबर) रात्री घरी तयार केलेली खिचडी खाल्ली होती. त्यानंतर बुधवारी पहाटे कुटुंबातील चौघांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. स्थानिक पातळीवर उपचार घेतल्यानंतर काहीशी प्रकृती सुधारली; मात्र गुरुवारी पहाटे आयुष व गायत्री यांची प्रकृती अचानक खालावली. दोघांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सिल्लोड येथे पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला. मात्र सिल्लोडला नेत असतानाच गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास आयुषचा मृत्यू झाला.
आयुषवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या गायत्रीला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास तिचीही प्राणज्योत मालवली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलग दोन दिवसांत आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ वडील नारायण थोटे यांच्यावर आली. खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन्ही मुलांना गमावल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी एम. एल. सिद्दीकी तसेच पिशोर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास करवंदे व मोरे यांनी थोटे यांच्या घरी भेट देऊन घरातील विविध वस्तूंचे नमुने तपासणीसाठी घेतले. दोन्ही मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.