Three people brutally beaten over a land dispute
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील घुसूर तांडा येथे शेतीतील कामाच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांनी पती, पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि. १० रोजी सायंकाळी घडली.
या प्रकरणी आदिनाथ शंकर जाधव (वय ३७, रा. घुसूर तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश शंकर जाधव, बन्सीलाल शंकर जाधव, सुनीता अंकुश जाधव व वनिता बन्सीलाल जाधव (सर्व रा. घुसूर तांडा) यांच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आदिनाथ जाधव हे त्यांची पत्नी मंजुळा व मुलगी राधा यांच्यासह शेतात कांद्याचे बी तयार करण्यासाठी कांद्याची बोंडे तोडत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व ही शेती आमची आहे, तुम्ही कांद्याची बोंडे तोडू नका, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद पुढे हाणामारीत परिवर्तीत झाला.
आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. बी. बोराडे करीत आहेत.