खरिपातील सात पिकांना मिळणार विम्याचे कवच pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crop Insurance : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पीक विम्याचे निम्मेच अर्ज

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विम्याचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

This year, crop insurance applications are half as many as last year

कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विम्याचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर आली आहे. मागील वर्षी भरलेल्या पीक विम्याचा लाभ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने यंदा पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

पीक विमा भरण्याची मुदत शासनाने १० ऑगस्टपर्यंत वाढविल्याने उर्वरित शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सन २०२५ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९९ हजार ३९ पीकविमाचे अर्ज भरून योजनेत सहभाग नोंदविला होता. मात्र यावर्षी मध्ये आतापर्यंत केवळ ४५ हजार ५०३ शेतकऱ्यांनीच पीक विम्याचे अर्ज भरले असूनही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे. त्यामुळे पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा घटलेला प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येत आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे मागील वर्षी भरलेल्या पीक विम्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही. तालुक्यातील १० कृषी मंडळांपैकी केवळ हतनूर व नागद या दोन कृषी मंडळांतील शेतकऱ्यांनाच पीक विमा मंजूर झाला. उर्वरित आठ कृषी मंडळांतील हजारो शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाच्या पीक विमा योजनेबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्याचा परिणाम यंदाच्या नोंदणीवर झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू असून अनेक भागांत पाऊस असला तरी पिकांवर रोगराई, अतिवृष्टी किंवा पावसातील खंड यांसारखी नैसर्गिक संकटे कायम आहेत. अशा परिस्थितीत पीकविमा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे संरक्षण असले तरी मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता अनेक शेतकरी विमा भरण्यापासून दूर राहिल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शासनाने पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे अद्याप पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षी विमा मंजुरीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने ठोस भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT