The shocking reality behind the expensiveness of municipal water tankers and the cheapness of private tankers
मुकेश चौधरी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीटंचाईमुळे नागरिकांना दूषित पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिकेचा अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, टँकर दरातील मोठी तफावत आणि नियंत्रणाच्या अभावसमुळे खासगी टँकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र या स्वस्त टँकरमधून पुरवले जाणारे पाणी नाल्यालगतच्या स्रोतांमधून भरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढारीच्या पाहणीतून समोर आले आहे.
शहरातील अनेक भागांना महापालिकेकडून नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पर्याय उरलेला नसून, पिण्यासाठी जारचे पाणी आणि घरगुती वापरासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु या टैंकरमधील पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही खात्री नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहणीदरम्यान काही भागांत टैंकर थेट नाल्यालगतच्या विहिरींमधून भरले जात असल्याचे आढळले. या विहिरींमध्ये सांडपाण्याची झिरपण होण्याची शक्यता अधिक असून, कोणतीही तपासणी किंवा शुद्धीकरण प्रक्रिया न करता हे पाणी नागरिकांना पुरवले जात आहे. हेच पाणी थेट घराघरांत पोहोचत असल्याने नागरिक नकळत दूषित पाणी वापरत आहेत. शहरातील काही ठिकाणी टैंकर चालक नाल्यालगत असलेल्या विहिरींमधून पाणी भरताना दिसून आले या विहिरींची स्वच्छता किंवा पाण्याची गुणवत्ता तपासली जात नसल्याने संपूर्ण पाणीपुरवठा साखळी संशयास्पद ठरत आहे.
पाण्याचा स्रोतच दूषित असल्याने ते नागरिकांपर्यंत सुरक्षित स्वरूपात पोहोचण्याची शक्यता अत्यल्प आहे. पाणीटंचाईमुळे निर्माण झालेला प्रश्न आता थेट सार्वजनिक आरोग्य संकटात रूपांतरित होत आहे.
मनपाच्या सेवेत विलंब, गैरसोय
महापालिकेकडून टँकरसाठी पैसे भरल्यानंतरही वेळेत पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी नागरिकांना तासंतास, तर काही ठिकाणी दिवसभर प्रतीक्षा करावी लागते. या विलंबामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास ढासळत असून, खासगी टैंकरकडे कल वाढत आहे
नियंत्रण यंत्रणा निष्क्रिय ?
टैंकर कोठून भरले जातात, पाण्याची गुणवत्ता तपासली जाते का, यावर कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून येते. प्रशासनाकडून नियमित तपासणी किंवा कारवाईचा अभाव असल्याने नफेखोरीला खतपाणी मिळत आहे.
नागरिकांची कोंडी
एकीकडे महाग आणि विलंबित महापालिका सेवा, तर दुसरीकडे स्वस्त पण संशयास्पद खासगी 5 टैंकर या दोन्हींच्या कात्रीत नागरिक सापडले आहेत. पाणी ही मूलभूत गरज असताना सुरक्षित पाण्यासाठीही नागरिकांना तडजोड करावी लागत आहे.
स्वस्त टँकरचा मोह, पण धोका मोठा
खासगी टैंकर ८०० ते ९०० रुपयांत सहज उपलब्ध होत असल्याने नागरिक त्याकडे आकर्षित होत आहेत. याउलट महापालिकेच्या टँकरसाठी सुमारे १२०० रुपये आकारले जातात, त्यातही वाहतूक खर्च स्वतंत्र असल्याने प्रत्यक्ष खर्च आणखी वाढतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना स्वस्त पर्याय निवडणे भाग पडत आहे. मात्र हा निर्णय त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.