The Shiv Sena's defeat in the municipal corporation elections; the committee has started investigating the reasons and will submit a report to Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा पराभव पत्कारावा लागला. पक्षाने सर्वाधिक ९७ उमेदवार देऊनही केवळ १४ जागाच जिंकता आल्या. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आता या पराभवाचे चिंतन सुरू झाले आहे. पक्षाचा पराभव का झाला याच्या कारणांचा शोध पक्षाची समिती घेत आहे.
महापालिकेत गेली तीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती. शिवसेना दुभंगल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरात आपली ताकद कायम राखली. लोकसभा निवडणूक जिंकत शिंदेंच्या सेनेने आपला झेंडा फडकवित ठेवला.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. त्यामुळे महापालिकेत पक्ष अशीच कामगिरी करेल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना होता. सुरुवातीला शिवसेना भाजप युतीचा प्रयत्न झाला. परंतु भाजपकडून समाधानकारक जागा मिळत नसल्याने युती तुटल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.
त्यानंतर शिवसेनेने ११५ पैकी तब्बल ९७ ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरविले. परंतु निकाल लागला तेव्हा शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. इथे पक्षाला केवळ १४ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या पराभवाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता पराभवाचा आढावा घेतला जात आहे. त्याचा अहवाल लवकरच पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.
मनपा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण पक्षाकडून केले जात आहे. पराभव का झाला याच्या कारणांचा शोध वरिष्ठ समितीकडून घेतला जात आहे. ही समिती संपूर्ण अभ्यास करून आपला अहवाल एकनाथ शिंदे यांना सादर करणार आहे.- संजय शिरसाट, पालकमंत्री.