The risk of kidney stones increases during the summer.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) होण्याचा धोका वाढतो. आधीपासून किडनी स्टोन असलेल्या रुग्णांमध्येही त्रास तीव्र होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेणे अत्यावश्यक असून, किडनी स्टोन रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. रोज ३ ते ४ लिटर पाणी प्यावे आणि योग्य सकस आहार घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
याबाबत मेडिकव्हर हॉस्पिटलचे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. मयूर दळवी म्हणाले, उन्हाळ्यात घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. परिणामी लघवीचे प्रमाण कमी होऊन खनिजे साचू लागतात आणि स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या काळात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेणे अत्यंत गरजेचे आहे.
किडनी स्टोन रुग्णांनी दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबूपाणी आणि नारळपाणी यासारखे नैसर्गिक पेय फायदेशीर ठरतात, कारण ते शरीरातील सिट्रेटचे प्रमाण वाढवून स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतात. तसेच आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, जास्त ऑक्सलेट असलेले पदार्थ (पालक, बीट, चहा, चॉकलेट) मर्यादित प्रमाणात घेणे आणि प्रथिनांचे (प्रोटीन) सेवन नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. फास्ट फूड आणि पॅकबंद पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. रुग्णांनी लघवी थांबवू नये, नियमित व्यायाम करावा आणि शरीर हायड्रेट ठेवावे. पोटदुखी, लघवीत जळजळ किंवा रक्त दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
योग्य आहार घ्या
उन्हाळ्यात किडनी स्टोन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि योग्य आहार घ्या हा साधा, पण प्रभावी मंत्र आहे. या बाबींची काळजी घेतल्यास किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मूत्र रोग संबंधी सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असून, प्रतिबंधात्मात उपाय योजनेवर भर द्यावा, असे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सांगितले.