The new 2500 mm diameter water pipeline is ready for testing
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरवासीयांसाठी टाकण्यात येत असलेल्या नवीन मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अखेर शेवटची जोडणी देखील शनिवारी (दि. २७) पूर्ण झाली आहे. त्यामुळे योजनेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथु यांनी दिली. त्यामुळे आता जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही ३८.४५ किलो मीटरची जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या चाचणीसाठी सज्ज झाली आहे.
नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत होते. हे अंतर ३८ किलोमीटर आहे. जलवाहिनी अंथरुन त्याचे वेल्डिंग करणे, करण्यात आलेले वेल्डिग तपासणे ही कामे कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत होती.
जलवाहिनी अंथरण्याचे काम जुलै २०२२ मध्ये सुरू झाले. सुमारे ९१० दिवसांनंतर हे काम शनिवारी संपले आहे. गेल्या आठवड्यात मुख्य जलवाहिनीचे तीन गॅप जोडणे बाकी होते, ते काम आता पूर्ण झाल्याची माहिती महेंद्र गोगुलोथु यांनी दिली.
पाणी पुरवठा योजनेचा एकूण खर्च २७४० कोटी रुपये आहे. त्यापैकी ५६० कोटी रुपये जलवाहिनीच्या कामासाठी कंपनीने खर्च केले असे, ते म्हणाले. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
जायकवाडी धरणात बांधण्यात आलेल्या जॅकवेलच्या स्वच्छतेचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (दि. २६) केली. जॅकवेलच्या स्वच्छतेचे काम झाल्यावर पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीचा मार्ग मोकळा होईल, असे गोगुथोलू यांनी सांगितले. ही पाणी पुरवठा योजना छत्रपती संभाजीनगर शहराची दशा आणि दिशा बदलणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१० दिवसांत चाचणीला सुरुवात
पाणी पुरवठा योजनेच्या चाचणीला येत्या दहा दिवसांत सुरुवात होऊ शकते, असेही महेंद्र गोगुलोधु यांनी सांगितले. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलची स्वच्छता पूर्णपणे केली जाणार आहे. जलशुध्दीकरण केंद्र व एमबीआर तयार आहेत. त्यामुळे चाचणी सुरू करणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला.