छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या रकमेतून महापालिकेने आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला १०५ कोटी रुपयांचा निधी दिली आहे. आता आणखी ८९ कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून मंजुरी मिळताच हा निधीदेखील वितरित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान कंत्राटदार एजन्सीकडून देयक थकल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.
शहरासाठी अमृत २ मधून मंजूर झालेली २७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेत महापालिकेला स्वहिस्स्या पोटी ३० टक्के म्हणजेच ८२२ कोटी रुपये टाकायचे आहेत. तर केंद्र सरकारचा २५ टक्के हिस्सा म्हणजे ६८१.४३ कोटी, राज्य शासनाचा ४५ टक्के म्हणजे १२२६.९६ कोटी रुपये हिस्सा योजनेत आहे.
मात्र, महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत प्रशासनाने कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ८२२.२२ कोटी रुपयांचे कर्ज हुडकोमार्फत मंजूर करून दिले आहे. हे कर्ज टप्प्या-टप्प्याने घेतले जात आहे.
पाणी योजनेच्या न्यायालयात झालेल्या नियमित सुनावणीच्यावेळी कंत्राटदाराची बिले थकल्याचा मुद्दा समोर आला होता. यासंदर्भात माहिती घेतली असता महापालिकेने कर्जाच्या ८२२ कोटीतून आतापर्यंत १०५ कोटी रुपये जीवन प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार दिले आहेत. दरम्यान आणखी ८९ कोटी रुपये देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.