The falsification of electoral rolls begins in the Collector's office Guardian Minister Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीतील मतदारयाद्यांच्या बोगसगिरीची सुरुवात कलेक्टर ऑफिसमधून होते. दरवेळी कलेक्टर ऑफिसकडून मतदारयाद्या नोंदणी आणि छपाईचे टेंडर निघते. ठराविक लोक हे काम अंदाजपत्रकापेक्षा ८० टक्के कमी दरात स्वीकारतात आणि नंतर मतदारयाद्यांमध्ये घोळ करून लाखो रुपयांची कमाई करतात, असा गंभीर आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी (दि.२१) शिवसेनेच्या कार्यक्रमात केला.
शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी संत एकनाथ रंगमंदिरात पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार संदीपान भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, विजय वाघचौरे, माजी महापौर त्र्यंबक तुपे आदींची उपस्थिती होती.
एसआयआरच्या अनुषंगाने बोलताना शिरसाट म्हणाले, सध्या मतदारयाद्या शुद्धीकरण मोहीम सुरू आहे. आपण सजग राहिले पाहिजे. शिवसेनेने आतापर्यंतच्या निवडणुका जोशावर लढल्या, परंतु आता राजकारणाची दिशा बदलत चालली असून, आपल्याकडे दरवेळी ५५-६० टक्क्यांवर मतदान जात नाही. तिकडे एसआयआरनंतर पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के मतदान झाले. कारण तिकडे बोगस मतदार वगळले गेले. आपल्यालाही बोगस मतदार वगळण्यासाठी काम केले पाहिजे. कारण ही मतदारयादी पुढील २० वर्षे कायम राहणार आहेत.
आपल्याकडे अतुल सावे केवळ सहा हजार मतांनी निवडून आले, थोडे इकडे तिकडे झाले असते तर गडबड झाली असती. माझ्या मतदारसंघात सिल्कमिलसारख्या काही भागात लोकसंख्या पंधरा हजार आहे आणि तिथे मतदान चौदा हजार होते. अठरा वर्षांखालील लहान मुले वगळली तर तिथे नऊ हजारांपेक्षा जास्त मतदान असणे शक्य नाही.
म्हणजेच मतदारयाद्यांमध्ये बाहेरची नावे समाविष्ट केली जातात. या बोगसगिरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. दरवेळी मतदारयाद्या बनविण्याचे टेंडर काढले जाते. हे टेंडर ठराविक लोक घेतात. तेही ८० टक्के कमी दराने. नंतर ते बोगसगिरी करून लाखो रुपये कमवतात, असा आरोप शिरसाट यांनी केला. एसआयआरसाठी आपण सर्वत्र पक्षाच्या वतीने बीएलए नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात चांगले काम सुरू आहे, परंतु शहरात काही अडचणी येत आहेत. पुढील कित्येक निवडणुकीत याच मतदारयाद्या कामी येणार आहेत, त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आपल्या विचारांची नावे कशी येतील यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी यावेळी केले.
शिरसाटांनी केले औवेसींचे कौतुक
आपण एसआयआरच्या कामात मागे आहोत. आपण महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहोत, पण हैदराबादहून तो असिदोद्दीन औवेसी इथे येतो आणि एसआयआरच्या कामाचे अॅप दाखवितो. आपल्याला जमत नाही, पण तो करतो आहे तर त्याचे कौतुक केलेच पाहिजे, असे सांगून शिरसाट यांनी चुकीचे मतदान कट करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.