Supply started from 2500 water pipeline
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आलेल्या नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून अखेर शहरात पाणी दाखल झाले आहे. नियोजित तारखेपूर्वीच गुरुवारी (दि. ४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) या जलवाहिनीतून शहरात १० एमएलडी पाश्याची आवक सुरू केली, अशी माहिती मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली. यामुळे आता शहरातील पाणीपुरवठ्यातील दिवसांचा गॅप कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन ही नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३९५ एमएलडीऐवजी २०० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार जायकवाडी येथील जॅकवेल आणि ३९ किलोमीटर अंतराच्या मुख्य जलवाहिनीची तांत्रिक चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पाण्याचा गढूळपणा कमी केल्यानंतर हे पाणी नव्या एमबीआरमध्ये (मास्टर बॅलेन्सिंग रिझव्हाँयर) घेण्यात आले. एमजेपीने १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे सर्व गॅप जोडून घेत गुरुवारी नव्या एमबीआरमधून मनपाच्या जुन्या जलवाहिनीमध्ये १० एमएलडी पाणी सोडले. आता टप्प्याटप्प्याने ही आवक वाढवून शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यात येईल, असे एमजेपीने स्पष्ट केले आहे.
३ आठवड्यांतच २५ एमएलडी वाढले
तीन आठवड्यांपूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू केल्याने पाण्याची आवक १८ एमएलडीने वाढली. आता नवी मुख्य २५०० ची जलवाहिनी कार्यान्वित करण्यास सुरुवात केल्याने पहिल्याच दिवशी त्यातून १० एमएलडी वाढले. त्यामुळे तीन आठवड्यांत शहराचे पाणी २५ ते २८ एमएलडीने वाढले.