Solar agricultural pumps: Maharashtra reaches 10 lakh mark
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
देशात आतापर्यंत १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ (६४ टक्के) एकट्या महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ८१७ (३४ टक्के) कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महाराष्ट्रानंतर हरियाणा - १ लाख २० हजार, राजस्थान १ लाख २७ हजार, उत्तरप्रदेश- ७१ हजार ५३८, झारखंड ६१ हजार ४५२, गुजरात २१ हजार ८९४ अशी क्रमवारी आहे.
याआधी महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्याची नोंद डिसेंबर २०२५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
१० लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. या योजनेमुळे १० लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे. या योजनेतील सौरपंपाला ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक आहे. तसेच सोलर पॅनेल्स आणि पंपाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, चोरीविरोधी विमा संरक्षणही उपलब्ध आहे.