Smart electricity meters give consumers a 'smart' shock, increase in electricity bills
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : वीज चोरीवर आळा घालण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचे कारण पुढे करत ग्राहकांचा विरोध झुगारून वेगाने मीटर बसवणे सुरू आहे. मात्र या मीटरच्या रीडिंगमुळे ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. चक्क ३०० ते ५०० रुपयांचा फटका बसत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. तर महावितरण जास्त बिलाचा दावा खोडून काढत आहे.
महावितरणने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी मल्टी मीटर बॉक्समध्ये ग्राहकांचे मीटर बसवले. त्यात चांगला परिणाम दिसून आला. असे असतानाही महावितरण स्मार्ट मीटर बसवत आहे. या मीटरमुळे दरमहा १०० ते १३० रीडिंग येणाऱ्या ग्राहकांना १५० ते १७० युनिटची रीडिंग येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. या मीटरला नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी कडाडून विरोध केला. विरोधापुढे झुकत हे मीटर केवळ सरकारी कार्यालये, निवासस्थान आणि व्यावसायिकांना लावणार असल्याची घोषणा केल्याने, हा विरोध काही काळ मावळला, परंतु मागच्या दाराने मीटर बसविणे सुरू केले आहे.
स्मार्ट मीटरच का ?
मल्टी मीटर बॉक्समध्ये ग्राहकांचे मीटर बसवल्याने वीज चोरीवर आळा बसला आहे. असे असतानाही महावितरणकडून स्मार्ट मीटरचा अट्टाहास का, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. ही नीती केवळ संबंधित कंपनीला पोसण्याची असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.
आंदोलन सुरू तरीही...
स्मार्ट मीटर ग्राहकांची लूट आणि खासगी कंपनीचे खिसे भरण्याचा उद्योग असल्याचा आरोप करत गेल्या सहा महिन्यांपासून दर सोमवारी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला झुगारून मीटर बसवणे सुरूच आहे. जिल्ह्यात सुमारे १ लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
मागच्या दाराने मीटर आले शासनाने घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवणार नाही. जर त्यांनी मागणी केली तरच हे मीटर बसवले जाईल, असे सांगितले होते. परंतु याला फाटा देत कंपलसरी धाक दाखवून हे मीटर बसवण्यात येत आहेत. हे धोकादायक असून, सरकार ठेकेदार पोसण्याचे काम करत आहे.अॅड. अभय टाकसाळ,
एकही तक्रार नाही स्मार्ट मीटर जास्त रीडिंग देते हे चुकीचे आहे. आम्ही एक लाख मीटर बसवले आहेत. त्यात एकाही ग्राहकाची तक्रार नाही. तक्रार आल्यास समांतर मीटर लावून आम्ही ग्राहकांच्या शंका दूर करू.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता