सिल्लोड : पावसाने दडी मारल्याने सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी उभी पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी डोंगरगाव, पालोद, शिवना, डीग्रस, पानवडोद, धोत्रा, अजिंठा, अनाड तसेच सोयगाव, फर्दापूर, फर्दापूर तांडा, धनवट व जंगला तांडा परिसरातील शिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
मका, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन फुलोऱ्याच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिके गुरांना चारण्यासाठी सोडून दिली आहेत. टोमॅटोचेही मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी मिरचीची पिके उपटून फेकून दिल्याचे दिसून आले.
यावेळी आमदार सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, धीर धरावा; राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगून, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शासनस्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सागर वाघमारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार (सोयगाव), शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, शेख सलीम, मुरलीधर काळे, नानासाहेब रहाटे, गणेश पाटील, प्रवीण मिरकर उपस्थिती होती.
पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.