सिल्लोड : ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक शेख इम्रान ऊर्फ गुड्डू यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तातडीने थांबवावी, अन्यथा १९ जूनपासून महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यापूर्वीही शेख इम्रान गुड्डू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक निवेदने दिली असून काही ग्राहकांनी लेखी आक्षेपही नोंदविले आहेत. मात्र, या आक्षेपांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंगळवारी शेख इम्रान गुड्डू यांनी महावितरणचे अभियंता पी.एम. काळे, डी.पी. मस्के यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरबाबत जाब विचारला. दरम्यान, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरूच राहिल्यास शुक्रवारपासून उपोषण छेडण्यात येणार असल्याचे शेख इम्रान गुड्डू यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेख इम्रान उर्फ गुड्डू, गीता गोरखनाथ घाडगे, कविता गायकवाड, जया कांबळे, प्रभावती आढाव, लता मैद, सरस्वती घाडगे, बाबाबई जाधव, ताराबाई चोपडे, संगीता कांबळे, कुसुम भोसले, राधाबाई मैण्द, लीलाबाई बर्डे, बाबा पठाण, शेख रफीक, शेख आबेद, इम्रान पठाण, अझीम पठाण, शेख नईम व बशीर खान उपस्थित होते.
संदेशामुळे संभ्रम
ग्राहकांची एनओसी न घेता मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच ४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे संदेश ग्राहकांना पाठविले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना स्मार्ट मीटरची सक्ती करणे अयोग्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.