सिल्लोड: अवैध पाणी उपशामुळे खेळणा धरणाने तळ गाठला, तर शहरातील बोअरवेल आटली आहे. परिणामी पाणीटंचाईच्या झळामध्ये भर पडली असून, शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर, ड्रमद्वारे पाणी विकत घेऊन शहरवासीयांना तहान भागवावी लागत आहे.
शहरात नवीन वसाहती झाल्या असून, शहर झपाट्याने वाढले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे खेळणा धरण तळाला गेले आहे. तरीही धरणातून अवैध पाणी उपसा केला जात असल्याने शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट उभे आहे.
शहरातील जवळपास 95 टक्के बोअरवेलचे पाणी आटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे अनेक भागांतील नागरिकांना 1 हजार लिटर पाण्यासाठी 400 रुपये मोजावे लागत आहे. तर काही भागांत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
यावर्षी दिवसेंदिवस उन्हाची तीवता अधिक जाणवत आहे. शहरात नवीन बोअरवेल घेतले जात असून, पाणी पातळी खालावल्याने बोअरवेल कोरडे जात आहे. शहरात नगरपरिषद प्रशासनाचे 139 अधिकृत बोअरवेल आहेत.
यापैकी जवळपास 95 टक्के बोअरवेलचे पाणी आटले आहे. तर शहरात खासगी बोअरवेलची संख्या जवळपास हजारापेक्षा आधिक आहे. मात्र बोअरवेल आटल्याने नागरिकांची तहान नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नगरपरिषद प्रशासनाने टॅंकरने का होईना, पण सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
खडकपूर्णाचे पाणी मुरते कोठे ?
शहरासाठी खडकपूर्णा येथून पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. याचे काम गेल्या सात- आठ वर्षांपासून सुरु देखील आहे. मात्र या योजनेचे पाणी अद्याप शहरात पोहचले नाही. फक्त शहरवासियांना या योजनेच्या पाण्याचे गाजर दाखवले जाते. या योजनेचे पाणी नेमके मुरते कोठे ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.