छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या वतीने संजय गांधी निर-ाधार, दिव्यांग, परितक्त्या, विधवा, तसेच ज्येष्ठांसाठी विविध योजना राबवते. यापैकीच एक श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जानेवारी २०२५ मध्ये एका ८५ वर्षीय ज्येष्ठांनी अर्ज केला आहे. वर्षभराचा कालावधी उलटूनही त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान आज या उद्या या अशी बोळवण करून ज्येष्ठांना खेट्या मारण्याची वेळ आली आहे.
६५ वर्षांवरील निराधार ज्येष्ठांना शासनाच्या वतीने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हनुमाननगर परिसरात राहणारे ८५ वर्षीय धनराज आसाराम पाटणी यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी अर्ज केला.
अर्ज केल्यानंतर लवकरच या योजनेत तुमचे नाव समाविष्ट होईल असे सांगण्यात आले. वर्षाचा कालावधी उलटूनही लाभ मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कक्षात अनेक चकरा मारल्या, परंतु त्यांना आज या उद्या या असे सांगून बोळवण करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या या आज या उद्या याच्या बोळवणीमुळे लाभधारक त्रस्त झाले आहेत. लाभ मिळण्यासाठी काही कागदपत्रे कमी किंवा इतर कागदपत्रांमुळे प्रस्ताव रखडला का याचीही माहिती संबंधितांकडून मिळत नाही. यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकजण लाभांपासून वंचित
पाटणी यांच्या प्रमाणेच अनेक ६५ वर्षांवरील ज्येष्ठ या योजनेचा लाभ मिळावा म्हणून धडपड करत आहेत. दरम्यान त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करण्यास अधिकारी कानाडोळा करत असल्याने त्यांना खेट्या मारण्याशिवाय पर्याय उरला नाही. खेट्या मारूनही लाभमिळत नसल्याने अनेकजण आशेपोटी वर्षभरानंतरही जिल्हाधिकारी कार्यालायाचे उंबरठे झिजवत आहेत.