छत्रपती संभाजीनगर : "तुझ्या मुलाने आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?" असे म्हणत चौघांच्या टोळक्याने एका कुटुंबावर कुऱ्हाड, लोखंडी गज आणि लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आनंदनगर (गल्ली नं. ४) येथे घडली. ज्ञानेश्वर दादाराव वाघमारे, शुभम मनोहर वाघमारे, दादाराव वाघमारे आणि टिल्लू (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. आनंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी रामनाथ बंडू भोजने (५५, रा. आनंदनगर, ग.नं. ४) यांच्या तक्रारीनुसार, रामनाथ भोजने हे भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरासमोर उभे होते. त्यावेळी चारही आरोपी त्यांच्याकडे आले. ज्ञानेश्वर वाघमारे याच्या हातात कुऱ्हाड होती. दादाराव याच्या हातात लोखंडी गज, तर शुभम आणि टिल्लू यांच्या हातात लाकडी दांडे होते.
"तुझ्या मुलाने आमच्या विरोधात काल पोलीस स्टेशनला तक्रार का केली?" असा जाब विचारत ज्ञानेश्वरने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती ओळखून रामनाथ यांनी त्यांचा मुलगा आकाश याला फोन करून बोलावून घेतले. आकाश तिथे येताच, "आज यांना जिवंत सोडायचे नाही," असे म्हणत आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले.
डोक्यात कुऱ्हाडीने वार
ज्ञानेश्वर वाघमारे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने रामनाथ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्याचवेळी शुभम आणि टिल्लू यांनी आकाशला लाकडी दांड्याने मारहाण केली. रामनाथ यांची पत्नी आणि सुनेलाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली. रामनाथ रक्तबंबाळ झाल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. जाताना त्यांनी आकाशच्या कारचेही नुकसान केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात चौघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रेशीम कोळेकर करत आहेत.