Sambhajinagar What happened to the Rs 59,000 crore package?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांपूर्वी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी छत्रपती संभाजीनगरात राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५९ हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र या पॅकेजमधील किती योजना प्रत्यक्षात आल्या याबाबत अजूनही ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
मराठावाडा मुक्तिसंग्रामच्या ७५ व्या वर्षानिमित्त सन २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याला ५९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
गतवर्षी संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक झाली. यंदा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. अद्यापही अधिकृत सूचना नसल्याने मंत्रिमंडळाची बैठक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी सरकारने मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे काय झाले याची माहितीही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. अर्थ्यांअधिक घोषणा कागदावरच असून, चालू योजना आणि काही सुप्रमालाच शासनाकडून निधी देण्यात आला आहे.
कोणत्या विभागाला किती निधी प्राप्त झाला, याबाबत विभागीय प्रशासनासह त्या-त्या विभागालाही ठोस माहिती नसल्याचे दिसत आहे. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एकूण ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तसेच पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी १४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे.
सर्व मिळून एकूण ५९ हजार ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यातील कोणत्या विभागाला किती निधी मिळाला याबाबत प्रशासनाने पाठपुरावा करूनही त्यांच्या हाती ठोस काही लागलेले नाही. यातील ३० ते ३५ टक्के निधी प्राप्त झाला असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठकीबाबत अद्याप सूचना नाही. काही सूचना प्राप्त झाल्यास तयारी करण्यात येईल.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त