Sambhajinagar Unseasonal Rain
वरठाण : वरठाणसह परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. बुधवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास कींन्ही परिसरात गारपीट आणि जोरदार वादळी पाऊस झाला.
या अवकाळी पावसामुळे केळी, ज्वारी, बाजरी आणि मका पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
वरठाणसह बनोटी, गोदेंगाव, वाडी, पळाशी, तिडका, बोरमाळ तांडा, हनुमंतखेडा, कींन्ही, घोरकुंड, पहुरी या परिसरात दोन दिवसांपूर्वीही गारपीट आणि पाऊस झाला होता. त्यातच बुधवारी रात्री पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. गुरुवारी कींन्ही परिसरात गारपीट झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.
मक्याची सोगणी करून ठेवलेले कणस भिजले असून उभे असलेले मका, ज्वारी आणि बाजरीचे पीक आडवे पडले आहे. कांदा पिकालाही मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पिकांवर मोठा खर्च करून शेतकरी काही दिवसांत माल घरात येईल, या अपेक्षेत असतानाच अवकाळी पावसाने त्यांच्या आशांवर पाणी फिरवले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.