छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व वातावरणाची चाहूल लागली असली तरी पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता कमी असून, उकाड्याचा जोर कायम राहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात ३ ते ६ जूनदरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असल्याने उष्ण-तेचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असून, उष्ण-तेसोबत हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक असह्य बनला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली, तर अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. जिल्ह्यात ३ ते ६ जूनदरम्यान कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
सापेक्ष आर्द्रता ३१ ते ७२ टक्क्यांदरम्यान राहणार असल्याने दिवसाच्या वेळी उकाडा आणि काही प्रमाणात दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार ७ ते १३ जूनदरम्यान जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
या काळात आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील, तर पर्जन्यमान तसेच कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व अधूनमधून ढगांची गर्दी आणि तुरळक सरी वगळता सध्या तरी व्यापक किंवा जोरदार पावसाची चिन्हे नसल्याने उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.