Godavari River Youth Drowned
पैठण : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पायथ्याशी वाहणाऱ्या गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव इम्रान दगडू बागवान तिसगाववाले (वय ४०, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गंगापूर येथील बागवान कुटुंबातील सुमारे २० ते २५ महिला-पुरुष आणि लहान मुले आले होते. लग्नविधी आटोपल्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण नाथसागर धरण पाहण्यासाठी गेले.
यावेळी धरणाचे दोन दरवाजे उघडे असल्याने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. वाहते पाणी पाहून बागवान कुटुंबातील पाच जण आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र, आंघोळ करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात ते बुडू लागल्याचे लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन बचावकार्य करत चार जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र इम्रान बागवान हे पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच बागवान कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांनी एकच आक्रोश करत मदतीसाठी याचना केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेंद्र जेवढे, हवालदार संतोष पालवे, संभाजी भोजने, राजेंद्र चव्हाण आणि गणेश साबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
तसेच पैठण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील जवान अमोल शेजुळ, जब्बी धांडे, अनिल गायकवाड आणि कामिल धांडे यांनी शोधमोहीम हाती घेतली. सुमारे काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इम्रान बागवान यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
या दुर्दैवी घटनेची माहिती लग्नसमारंभासाठी आलेल्या नातेवाईक व पाहुण्यांना मिळताच नाथसागर धरण परिसरात मोठी गर्दी झाली. कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते.