Sambhajinagar OBC Welfare Minister Atul Save
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेनेनंतर आता जिल्हा परिषदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काबीज करायची आहे. त्यामुळे प्रत्येकानेच बूथवर अधिक प्रभावीपणे काम करून सक्षम करायचे आहेत, असे आदेश मंगळवारी (दि. २७) भाजपच्या विभागीय कार्यालयात जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी निरीक्षकांना दिले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, दुसरे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्यासह बसवराज मंगरुळे, बापू घडामोडे, प्रवीण घुगे, विवेक देशपांडे प्रशांत देसरडा, किरण पाटील, ताराचंद गायकवाड, छाया खाजेकर यांच्यासह निरीक्षक उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालयात भाजप निरीक्षकांची बैठक घेण्यात आली. यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतील कामाची जबाबदारी देताना कशा प्रकारे काम करायचे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
आगामी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने निरीक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक बूथ सक्षम करायचा आहे. त्यासाठी बूथ पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्यावर भर द्या, असे मंत्री सावे म्हणाले. त्यासोबतच शहरातील सुमारे २०० पदाधिकारी ग्रामीण भागात जाऊन भाजपचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल
ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत लाडसावंगीत भाजपने कॉंग्रेसला भगदाड पाडले आहे. येथील अर्चना पडूळ, प्रमोद भालेराव, केदार पडूळ, सुनील हिवराळे, अमोल अंबेकर, गंगासर ढोके, समी बागवान, लक्ष्मण चालंगे, सुदाम पडूळ व तातेराव पडूळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. विभागीय कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.