Sambhajinagar News : Ward development works stalled due to the Code of Conduct
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेवर मागील सहा वर्षे प्रशासकराज होता. नुकत्याच जानेवारीमध्येच निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक प्रभागातील विकासकामे कधी सुरू होतील, यासाठी अतुर झाला असून, अर्थसंकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. या मंजुरीपूर्वीच अनेकांनी अंदाजपत्रकही तयार करण्यावर जोर लावला. त्यास मंजुरी मिळण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता २२ जूनपर्यंत नगरसेवकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
शहरात पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने पार पडली आहे. यात एका प्रभागात अ, ब, क आणि ड असे चार नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुका संपताच महापालिकेत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत दीड महिना निघून गेला. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाल्यावर महापालिकेच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
महापौर निवडीनंतर आतापर्यंत पाच सर्वसाधारण सभा संपन्न झाल्या आहेत. यातील पहिलीच सर्वसाध ारण सभा ही स्थायी समिती सदस्य आणि विषय समिती सदस्य निवडीची होती. दरम्यान, सभापतीपदी अनिल मकरिये यांची निवड झाल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात थोडीफार सुधारणा करून महापौर समीर राजुरकर यांनी अंतिम अर्थसंकल्प तयार केला आहे.
महापौरांनी तयार केलेला अर्थसंकल्प विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकला आहे. आचारसंहिता संपल्यावर महापौर अधिकृतपणे अर्थसंकल्प जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु या मंजुरीपूर्वीच सत्ताधारी पक्षाच्या नगर-सेवकांनी आपापल्या प्रभागातील विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करण्यावर जोर दिला आहे. मागील दोन आठवड्यांत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेवकांनी अंदाजपत्रक तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली
२२ जूनपर्यंत प्रतीक्षाच
विधान परिषद निवडणुकीची निवडणूक १९ जून रोजी होणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी आचारसंहिता संपणार असून, त्यानंतरच विकासकामांच्या संचिका व अंदाजपत्रकांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आणखी तीन आठवडे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.