Sambhajinagar News : Failure to Reduce Stages in City Water Supply : Mayor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी टप्पे कमी करण्याचा निर्धार केला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याची स्पष्ट कबुली बुधवारी (दि.२०) महापौर समीर राजुरकर यांनी दिली. महापौर म्हणून त्यांच्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राजुरकर यांनी सांगितले की, पाणीपुरवठ्याचे टप्पे कमी करण्याच्या प्रयत्नात काही प्रमाणात यश मिळाले असून, अद्याप पूर्ण उद्दिष्ट साध्य झाले नाही. त्यामुळे टप्पे कमी करण्यापेक्षा निश्चित वेळापत्रकानुसार नागरिकांना पाणी मिळावे, यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. तसेच नव्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून अतिरिक्त १३ एमएलडी पाणी उपलब्ध झाले असून, त्याचा शहराला लाभहोईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान विविध विभागांतील समन्वय आणि तांत्रिक अडचणींवर मात करत नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्यात पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७ या संकल्पनेअंतर्गत सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट स्थापन करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला. यात शहर नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, नदी संवर्धन, अनधिकृत वसाहतींवर नियंत्रण, सीएसआर निधीचे प्रभावी नियोजन आणि आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हे युनिट थिंक टँक म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी शहरातील आयआयटीच्या युवकांनाही या उपक्रमाशी जोडण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील शंभर दिवसांत नवीन पाणीपुरवठा योजनेतून २०० एमएलडी पाणी शहराला उपलब्ध करून देणे, सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटची स्थापना आणि कंप्लिशन सेल सुरू करणे असे उद्दिष्ट असल्याचे महापौर राजुरकर यांनी नमूद केले. यासह प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मिशन कर्मयोगी अभियाना राबविण्यात येणार असून, सांस्कृतिक क्षेत्रासाठी महापौर चषक एकांकिका स्पर्धा, संगीत महोत्सवा आणि त्रैभाषिक कवी संमेलनाचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभर दिवसांत केवळ नामांतराचेच काम महापौरांच्या शंभर दिवसाच्या कार्यकाळातील कामांवर विरोधी पक्षाने सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून शंभर दिवसांत केवळ चौक आणि रस्त्यांची नामांतरे करण्यात आली. विकासाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून, चंपा चौक ते जालना रोड विकास आराखड्यातील रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- समीर साजिद बिल्डर, मनपा विरोधी पक्षनेते