Sambhajinagar News : पावसात पुलाखाली अंत्यसंस्कार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पावसात पुलाखाली अंत्यसंस्कार

स्मशानभूमीचे शेड वर्षभरापासून गायब, वैसपूर टाकळी ग्रामस्थांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Cremation performed under a bridge amidst rain

चापानेर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील वैसपूर (टाकळी) येथील स्मशानभूमीचे शेड मागील वर्षीच्या पुरात वाहून गेल्यानंतरही वर्षभर लोटून त्याची पुनर्बाधणी करण्यात आलेली नाही. परिणामी रविवारी (दि.२८) एका व्यक्तीच्या निधनानंतर रिमझिम पावसात पुलाखाली अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

मागील वर्षी शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. या पुरात स्मशानभूमीवरील टिनपत्रे वाहून गेली, तर लोखंडी खांबही उखडून गेला. त्यानंतर ग्रामपंचायतीने शेड उभारण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून कोणतीही मदत मिळाली नाही.

यामुळे मागील वर्षीच्या पावसाळ्यातही ग्रामस्थांना पुलाखाली अंत्यविधी करावे लागले होते. यंदाही तीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, स्मशानभूमीचे शेड तातडीने उभारण्यात आले नाही तर पुढील अंत्यविधी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयासमोर करून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल.

प्रशासनाचे दुर्लक्ष

वैसपूर (टाकळी) येथील स्मशानभूमीचे शेड पुरात वाहून जाऊन वर्ष उलटले, तरी प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधीसाठी पुलाखाली आश्रय घ्यावा लागत आहे. मृतालाही सन्मानाने निरोप देता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT