छावणी पोलिसांच्या एका चुकीने खुनातील आरोपी मोकाट  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar murder case : छावणी पोलिसांच्या एका चुकीने खुनातील आरोपी मोकाट !

९१ व्या दिवशी दोषारोपपत्र; हलगर्जीपणामुळे ४ आरोपींना डिफॉल्ट जामीन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र वेळेत दाखल न केल्याने शकील रेफ शेख (३०, रा. फुलेनगर, ४ पंढरपूर) याच्या खून प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ९० दिवसांची मुदत असताना ९१ व्या दिवशी चार्जशीट दाखल करण्याच्या या हलगर्जीपणामुळे छावणी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुरते वाभाडे निघाले आहेत. या प्रकरणी तपासी अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

६ जानेवारी रोजी कासंबरी दर्गा व जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर शकील शेख याची त्याच्याच मित्रांनी कट रचून निघृण हत्या केली होती. पैशाची देवाणघेवाण आणि पूर्ववैमनस्यातून आरोपींनी शकीलचे ४ जानेवारीला अपहरण केले. कासंबरी दर्गा भागात सिराच्या खोलीत नेऊन त्याला मारहाण केली. तेथून जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर नेले. तेथे त्याच्या पायाला सिगारेटचे चटके देत अमानुष छळ करण्यात आला. गळा चिरून त्याची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढल होता. या खळबळजनक घटनेनंतर गुन्हे शाखेने वेगाने तपास करत ८ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

पोलिसांची ती एक चूक अन् आरोपींना फायदा

पुढील तपासाची जबाबदारी छावणी पोलिसांकडे होती. खुनाच्या गुन्ह्यात ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करणे कायदेशीररीत्या बंधनकारक असते. मात्र तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन गाडेकर आणि प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांच्या ढिसाळ कारभारामुळे हे दोषारोपपत्र चक्क ९१ व्या दिवशी दाखल झाले.

केवळ एका दिवसाच्या या विलंबामुळे कायद्यातील तरतुदीचा फायदा घेत शेख राहील शेख नजीर (२३), शेख शाहीद शेख नजीर (२९), सय्यद सिराज ऊर्फ मारी सय्यद नासेर (२९, तिघे रा. कासंबरी दर्गाजवळ, पडेगाव) आणि शेख साहील ऊर्फ बाबा शेख राजू (२३, रा. बुड्डीलाईन) अशी जामिनावर सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. या ४ प्रमुख आरोपींना डिफॉल्ट जामीन मिळाला आहे. उर्वरित दोघांनी अर्ज केला नाही आणि दोघांना जामीनदार न मिळाल्याने ते अद्याप कारागृहात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मॉनिटरिंग कुठे गेले?

९० दिवसांची मुदत पोलिसांना तोंडपाठ असते. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात ९१ व्या दिवशी चार्जशीट दाखल होणे संशयास्पद आहे. खुनाच्या गुन्ह्यांचा तपास फक्त तपासी अधिकारी करत नसतो, तर ठाणेदार, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त हे वेळोवेळी या गुन्ह्यांचा आढावा घेत असतात. मग ९० दिवस संपत आले तरी चार्जशीट दाखल का झाली नाही, हे या वरिष्ठांच्या लक्षात कसे आले नाही?

अनुभवी अधिकाऱ्याची गरज

शहर पोलिस आयुक्तालयात अनेक अनुभवी पोलिस निरीक्षक साईड ब्रँचला किंवा नियंत्रण कक्षात बसून आहेत. असे असताना छावणीसारख्या अत्यंत संवेदनशील पोलिस ठाण्याचा कारभार पोलिस आयुक्तांनी एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याकडे का सोपवला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

विभागीय चौकशी सुरू - तपास अधिकाऱ्याकडून चूक झाली असून, त्यांनी ९१ व्या दिवशी दोषारोपपत्र सादर केले आहे. यासंदर्भात कसूर अहवाल मागविला असून, माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. निलंबनाची कारवाई होऊ शकते. ठाणेदारांबाबतही अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.
पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
९० व्या दिवशी रविवार आल्याने चूक झाली - तपास अधिकाऱ्याने सर्व मंजुरी घेऊन दोषारोपपत्र तयार केले होते. मात्र व्या दिवशी रविवार आल्याने तपासिक अधिकाऱ्याकडून चूक झाली आहे. त्याने ९१ व्या दिवशी दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात कसूर अहवाल पोलिस उपायुक्त यांच्या मार्फत पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठवत आहे.
विवेक जाधव, सहायक निरीक्षक (प्रभारी, छावणी पोलिस ठाणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT