छत्रपती संभाजीनगर : कमवा आणि शिका योजनेअंतर्गत तीन वर्षे कामगारांसारखे राबवून घेऊनही आश्वासनाप्रमाणे पदवी (डिग्री) दिली जात नसल्याने संतापलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी बजाज कंपनीसमोर मंगळवारी (दि.११) सकाळी कामबंद आंदोलन पुकारले. प्रवेश आणि कागदपत्रांच्या गोंधळामुळे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाळूज येथील बजाज कंपनीसमोर सकाळी आठ वाजेपासून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले. कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डिग्री देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेशच झालेले नाही, तर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले त्यांचा तीन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनही त्यांना अद्याप डिग्री मिळालेली नाही, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही डिग्रीपासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ डिग्री देण्यात यावी, तसेच प्रवेश आणि कागदपत्रांबाबतची स्पष्ट माहिती द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कामगारांप्रमाणे राबवणूक आणि कागदपत्रांचा घोळ
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून एखाद्या नियमित कामगाराप्रमाणेच पूर्णवेळ काम करून घेतले जाते. मात्र त्यांना नियमित वेतनाऐवजी केवळ स्टायपेंड दिला जात असल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यातच भर म्हणून, २०२४ मध्ये काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे नाकारण्यात (रिजेक्ट) आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी याविषयी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. आता तब्बल दोन वर्षांनंतर, जुलै २०२६ मध्ये त्यांना याबाबत माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे.
वाळूजमधील बजाज ऑटो प्लांटसमोर सकाळी ८ वाजेपासून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन.
कमवा आणि शिका योजनेत ३ वर्षे पूर्ण करूनही विद्यार्थ्यांना डिग्री नाही; काहींचे प्रवेशच झाले नसल्याचा आरोप.
विद्यार्थ्यांकडून नियमित कामगारांसारखे काम करून घेतले जाते, मात्र वेतनाऐवजी केवळ स्टायपेंड.
२०२४ मध्ये रिजेक्ट झालेल्या शैक्षणिक कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांना थेट जुलै २०२६ मध्ये दिल्याने संताप.
भवितव्य अंधारात असल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ डिग्री द्यावी आणि प्रवेशाबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी
विद्यार्थी प्रतिनिधी आणि कंपनी अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. प्रमाणपत्र मिळावे, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. तसेच अन्य काही प्रश्न आहेत. बैठकीनंतर कंपनीचे अध्यक्ष आणि एका पक्षाचे वरिष्ठ संस्थापक अध्यक्ष यांच्यात बोलणे झाले आहे. एक ठराविक वेळ त्यांनी घेतली आहे. कंपनी आणि विद्यार्थी प्रतिनिधी पुन्हा बैठक घेऊन हे विषय कायमस्वरूपी सोडविण्यासाठी चर्चा करणार आहेत. पोलिस प्रशासनाकडे जे अर्ज येतील त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
युवकांच्या पाठीशी मनसे उभी 'कमवा आण िशकिा'च्या नावाखाली हजारो युवक-युवतींची फसवणूक मनसे कदापि होऊ देणार नाही. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. युवकांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही.बिपीन नाईक, जिल्हा संपर्क अध्यक्ष, मनसे