रामदास आठवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Ramdas Athawale : बाबासाहेबांच्या विचारांसाठी रिपाइं कटिबद्ध

गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

RPI committed to Babasaheb's thoughts: Athawale

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :

जाती-धर्मांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) हा पक्ष देशातील सर्व सोबत घेऊन बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव दादा कदम होते. यावेळी मिलिंद अण्णा शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, जिल्हा अध्यक्ष विजय मगरे, दिलीप पाडमुख, लक्ष्मण हिवराळे, संतोष कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले की, रिपाइं पक्ष देशातील अनेक राज्यांमध्ये विस्तारत असून, हजारो तरुण पक्षात सक्रिय होत आहेत. विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील अस्थायी कामगारांच्या पाठीशी पक्ष सक्षमपणे उभा आहे. तरुणांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन छोटे-मोठे उद्योग उभे करावेत आणि आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या खास शैलीत कविता व शेरोशायरी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा संघटक जे. के. आमराव यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे, जे. के. आमराव, सुकदेव सोनवणे, चेतन सोनवणे आणि गंगापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

SCROLL FOR NEXT